Tuesday 6 February 2018

द्रव्यांशी होणारा तेजाचा संयोग वियोग (Movement of Energy among Substances)

ऊनपावसाचा खेळ म्हणजे पाठशिवणीचा खेळ. खरं तर पाऊस पडायला कारणसुद्धा ऊनच. एकच ऊन मातीवर वेगळा, पाण्यावर वेगळा व हवेवर वेगळा परिणाम करते. ऊन्हाळ्यात ऊन लागून घडक तापतात. पाऊस पडला की तडकतात. समुद्राचं पाणी तापलं की वाफा आकाशाच्या दिशेने जाऊ लागतात. त्यांना गारवा लागला की पुन्हा बरसतात. जमिनीचा एक पट्टा जास्त तापला की झालेच त्याच्याकडे थंड हवेचे येणे जाणे चालू. गर्मीच्या, उष्णतेच्या पायाला कायमच चक्र लागलेली. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर गरम दुध बशीत ओतले की ते थंड व्हायला लागलीच सुरुवात.

“विक्रमा, हे तेज द्रव्याचं येणं जाणं मजेशीरच वाटतं रे मला. काय हा स्वभाव. सारखं तापायचं व थंड व्हायचं. पण मला सांग या जाण्यायेण्याबद्दल काही बोललेत का प्रशस्तपादऋषी?”

“हो वेताळा, पृथ्वी व तेज द्रव्यांमध्ये तात्कालिक प्रवाहीपणा असतो.
क्षितितेजसोर्नैनिमित्तिकद्रवत्वयोग: ||33||
Earth and Fire are possessed of only such fluidity as is brought about by extraneous causes.
पृथ्वी व तेज यांमध्ये निर्माण होणारा प्रवाहीपणा हा बाह्यकारणांमुळे निर्माण झालेला असतो. बाह्यकारण म्हणजे बशीत गरम दूध ओतलं की दूध थंड होत जावं तसं..गरम दूध हे बशीला गरम करतं व आजुबाजूच्या हवेला गरम करतं.”  
“पण विक्रमा हे गरम करणं कधीपर्यंत चालतं?”

“वेताळा उष्णतेचं हे वाहणं तसं तात्पुरतंच.
अनाश्रितत्वनित्यत्वे चान्त्यत्रावयविद्रव्येभ्य: ||21||
ज्ञानेंद्रियांनी ज्यांचे अवयव जाणता येतात (स्थायू, जल, वायू, तेज) ती द्रव्ये दुसऱ्यांवर अवलंबून असतात व ती निश्चित काळापर्यंतच अस्तित्त्वात असतात. म्हणजे असं की जसजसे त्या दुधाभोवतालची बशी व हवा गरम होते तसं दूध थंड होत जातं. आधुनिक काळातील उष्मागतीकी(thermodynamics) मध्ये याविषयीचा एक नियमच देण्यात आला आहे...”



“नाही थांब थांब, मला सांग की वैशेषिकामध्ये सांगितलेली राहिलेली आठही द्रव्ये म्हणजे स्थायू, द्रव, वायू, आकाश ही सर्वच तापतात? त्या सर्वांनाच तेज द्रव्याची बाधा होते?”

“नाही वेताळा, पृथ्वी, आप, तेज व वायू हीच फक्त तापतात. बाकी सर्वांवर उष्णतेचा काहीही परिणाम होत नाही.
चतुर्णां द्रव्यारम्भकत्वस्पर्शवत्त्वे ||26||
To the four belong the characters of – being the material or component cause of substances, and of being perceptible by touch.
पृथ्वी, आप, तेज आणि वायू – या जडरूप द्रव्यांतून इतर द्रव्ये बनतात आणि त्यांना तापमान असते.
“विक्रमा उष्णतेला जाण्या येण्यासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यम लागते हे माहित आहे. पण तेजाला किंवा उष्णतेला सुद्धा स्पर्श असतो? म्हणजे तेजाचे जाणेयेणे कोणत्याही स्थायू, द्रव, किंवा वायुशिवायही होऊ शकते?”

“मी याचं थोडं टप्प्याटप्प्याने उत्तर देतो. उष्णतेच्या जाण्यायेण्याचे चार प्रकार आधुनिक भौतिकशास्रात सांगितले आहेत..अभिक्रमण(advection), वहन(conduction), अभिसरण(convection) आणि प्रारण(radiation)..”

“उदाहरण दे..”

“वेताळा, जेव्हा एक गरम पदार्थ प्रत्यक्ष दुसऱ्या पदार्थात ओतला जातो..”



“अरे म्हणजे चहा किटलीतून कपात ओतला जातो म्हणना..काय हे अवघड बोलणं..”

“हो, म्हणजे जेव्हा गरम चहा थंड ग्लासात ओतला जातो. तेव्हा ते अभिवहन झाले किंवा अभिक्रमण.."

"अरे अभिक्रमण वगैरे कसं अगदी आक्रमण वाटतं..एखादा हल्लाच जणुकाही..  एका सैन्याने  दुसऱ्या सैन्यावर केलेलं .. "

"चहा कपातून बशीत ओतताना तुम्हाला ते कपातलं  वादळ वाटतं.. पण जर मी तुला दुसरं उदाहरण दिलं तर त्याची दाहकता कळेल.." 

"दाहकता ?"

"हो .. जेव्हा ज्वालामुखी फुटतो व लाव्हारस सगळीकडे पसरतो तेव्हा तेही अभिक्रमणच असतं..तो तापलेला रस जेव्हा सगळा मुलुख बेचिराख करतो ते असतं अभिक्रमण .. "  



"बापरे.. दुसरा काही मवाळ प्रकार सांग.." 

"जेव्हा एक वस्तू तिच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या दुसऱ्या वस्तूला किंवा द्रव्याला उष्णता  देते ते झाले वहन(conduction)..

“अच्छा म्हणजे गरम दुधाचे बसल्या जागी खुर्ची.. आपलं बशी गरम करणे..ते वहन..”


  
“हो थेट संपर्कातून गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे तेजद्रव्याचे जाणे म्हणजे वहन..”
"विक्रमा, जरा डोक्यात लख्ख प्रकाश पडेल असं उदाहरण दे जरा.."


"वेताळा, उपमेच्या भाषेत बोलतो. एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामगार एक लांबच लांब रांग करतात..व सिमेंटच्या पाट्या एकमेकाला देतात..हे वहन..उष्णतेची प्रत्यक्ष हातोहात देवाणघेवाण.."


“अच्छा, आणि अभिसरण म्हणजे?”



“म्हणजे वेताळा, एका बंबात पाणी गरम करायला ठेवले आहे. बुडाशी असलेले पाण्याचे रेणू वहनाने गरम होतात. गरम झाले की वरच्या रेणूंना सारतात म्हणजे ढकलतात व स्वत: वर जातात. त्यामुळे वरचे थंड रेणू खाली ढकलले जातात. असा एक ढकलाढकलीचा खेळच सुरु होतो..हे अभिसरण..द्रव व वायूंमध्ये जे उष्णतेचे जाणे येणे होते ते अशाच अभिसरणामुळे..”

"अरे दर वेळेला कारे म्हणायला लावतोस? पाहिल्यासाठी लाव्हारस, वहनाला कामगारांची उपमा दिलीस? अभिसरणासाठी काय उदाहरण देशील?"

"अभिसरण नवीन नाही आपल्याला..गर्दीने ढकलले जात जाणे या अर्थी मी ही लोकलट्रेन मध्ये चढणाऱ्या लोकांची उपमा देतोय.."




“म्हणजे विक्रमा, स्थायू, द्रव, वायूंशी प्रत्यक्ष संपर्कातून होते ते वहन, द्रव व वायूंमध्ये असे ढकलाढकलीतून होते ते अभिसरण..पण जर स्थायू, द्रव किंवा वायू काहीच नसेल तर उष्णता कशी पोहोचते?”



“वेताळा जेव्हा उष्ण पदार्थ व थंड पदार्थामध्ये कोणत्याही माध्यमाशिवाय उष्णता फिरते तेव्हा ते प्रारण. म्हणजे बघ शेकोटीत चमचा ठेवला तर गरम होतो वहनामुळे. शेकोटीच्या आजुबाजूची हवा गरम होते ती अभिसरणाने. पण शेकोटीवर हात ठेवला तर अधिक उष्णता जाणवते.”

“अरे पण शेकोटीभोवती हवा आहे ना ती तापवत असेल..”

“नाही वेताळा, हवा ही उष्णतेची फारशी चांगली वाहक नाही..स्थायू चांगले वाहक असतात, त्यापेक्षा द्रव कमी व त्यापेक्षा वायू कमी..”

“बर बर..पण कोणतेही माध्यम नाही तर ही उष्णता जाते कशी? पुरावा काय?”

“वेताळा उद्या सकाळी पूर्वेकडे पहा..पुरावा मिळेल..सूर्याची उष्णता इतके हजार किलोमीटर पर्यंत प्रवास करून आपल्यापर्यंत येते..एवढंच काय तर मातीत लपलेल्या बीजालाही ऊब देते..पृथ्वी व सूर्य यांच्यातल्या पोकळीत ही उष्णता तरंगांच्या स्वरूपात प्रवास करते..”

“अरे तरंग म्हणजे तर आकाश द्रव्य..”


“होय वेताळा..तेज द्रव्याला जायला माध्यम असेल तर ते तेज स्वरूपात जाते. जर माध्यम नसेल तर ते तरंगरूप घेते व प्रवास करते. हीच ती तेजद्रव्याची दोन रूपे(dual nature). पण जर हेच तरंग भिंगाने एकत्र केले तर तेजद्रव्य पुन्हा उष्णतेच्या रूपात प्रकटते व कापसाला जाळते..”

“होय वेताळा..पण जर हेच तरंग भिंगाने एकत्र केले तर ती उष्णता कापसाला जाळते..”



“विक्रमा, एवढं तू तेजाचं पुराण लावलंस पण त्या तेजाचं वहन किती काळापर्यंत चालू राहतं, कधी थांबतं हे मात्र सांगितलंच नाहीस..शिवाय हे तेज बलप्रयोग कसं करतं? गती कशी निर्माण करतं हे पण बोलला नाहीस..नुसता पाल्हाळ लावत बसला होतास..अरे काय पण आता या सृष्टीत तेज वाहवण्यासाठी आला तुमचा तो भास्कर पूर्वेला..म्हणजे माझी निघायची वेळ झाली..आम्हाला भिती रे त्याची..येतो रे विक्रमा पुन्हा बोलायला..या तेजाविषयी व त्याच्या बळाविषयी..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

अजून एक अंधारी रात्र सरली. सूर्याचा उजेड पडला. अज्ञान थोडे कमी झाले, ज्ञानप्रकाश चहूंकडे पसरला. भारतीय संस्कृतीत ज्याचं वर्णन ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असं केलंय त्या वचनाच्या प्रकाशात जो तो आपला उन्नतीचा मार्ग चोखाळू लागला..

(क्रमश:)

मूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

No comments:

Post a Comment